Wednesday 25 November 2015

नाईट शिफ्ट...बातमी आणि मी

         मीडियाचा कोर्स करत असताना आम्हां सगळ्यांना रात्री जागून प्रोजेक्ट करण्याची,प्रेझेंटेशनची तयारी करण्याची सवय लागली...आणि रात्रभर कोणत्या तरी मैत्रिणीच्या घरी जमून कॉफी पित,गप्पा मारत अभ्यास व्हायचा..तेव्हा वाटायचं रात्री काम करण्यात एक वेगळी मज्जा आहे..इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आल्यावर नाईट शिफ्ट असते...आणि रात्री घुबडासारखं जाग राहून काम करण्याची इच्छा असल्याने नाईट शिफ्ट लागल्यावर खूप अप्रुप वाटलं...उत्साह वाटला..

मुंबईत नाईट शिफ्ट...रात्रीची मुंबई पहायला मिळणार याचं खूप कौतुक होतं...ईटीव्हीमध्ये ऑफिस सहाव्या मजल्यावर होतं आणि रात्री लिफ्ट नसते...सहा मजले चढून जाव लागणार .. तरीही नाईट शिफ्टचा उत्साह होता...नवीन नवीन लागल्यावर सर्व नाईट शिफ्टच्या रिपोर्टर्सचे नंबर घ्या...सगळ्यांशी बोला..संपर्कात रहा हे जमल..मग ठरवून नाईट रिपोर्टर्स चहा प्यायला भेटायचे...या भेटीतून दादर टीटी जवळील ज्यूस शॉपची ओळख झाली...जिथे पार मध्यरात्री दोननंतर पावभाजी,पिझ्झा मिळायचा...अगदी रस्त्यावर बसून लोक या पदार्थांचा आस्वाद घ्यायचे...चर्चगेट बाजूला बनपाव,बटर,ब्रेडजाम मिळायचे...झीच्या चिंचपोकळी ऑफिसकडे पहाटे तीन नंतर गरम गरम पोहे आणि शीरा मिळायचा
झीमध्ये नाईट शिफ्ट असताना पोहे खायला जायचो..आणि मिलच्या सकाळच्या शिफ्टसाठी हे पोहे-शिरा लोक विकायचं हे कळलं...आता मिल राहिली नाही...त्या शिफ्ट राहिल्या नाही...पण पोहे शिराने नाईट शिफ्ट करणाऱ्या मिडीयामधील लोकांना आधार दिला....

            २००५मध्ये डान्स बार बंदी आल्यावर नाईट शिफ्ट पत्रकारांसाठी ठरलेली बातमी म्हणजे कोणत्या तरी बारवर पोलिसांनी घातलेली रेड...एकदा रविवारी घाटकोपरमध्ये रेड पडलेली...ईटीव्हीमध्ये रविवारी ऑफिसची गाडी नसायची त्यामुळे आम्ही टॅक्सी करून फिरायचो...रेड पडली कळल्यावर खाली टॅक्सी मिळण्यात वेळ गेला...नरिमन पॉ्ईन्ट वरून घाटकोपरला पोहचलो...तिथे त्या बारचं ठिकाण शोधत होतो...कॅमेरामनने काही लोकांना पत्ता विचारला..तर त्या लोकांनी माझ्याकडे पाहून हळूच त्याला सांगितल...अरे ,लडकी को लेके उस बार में मत जा...अभी वहा रेड हुवा हे...हे ऐकल्यावर त्याने सांगितलं..आम्ही पत्रकार आहोत...मग त्यांनी पत्ता सांगितला..आम्ही त्या बारकडे पोहचलो..तिथे काही चॅनेलचे इतर पत्रकार पोहचले होते..अजून एक महिला पत्रकार होती..आम्ही गप्पा मारत उभे होतो...पोलिसांची कारवाई होईपर्यंत बाईट मिळण्याची शक्यता नव्हती..त्या बारचा मालक साऊथ इंडियन होतो..त्याने ईटीव्हीचा बूम पाहिला..आणि अचानक चिडला...ईटीव्ही दक्षिणेकडे प्रसिध्द असल्यामुळे कदाचित त्याला भीती वाटली असले..बदनामाची..पण मग त्याने पोलिसापासून सुरूवात केली...की बारवर रेड का टाकतात..आम्ही काय केल...त्या बारबाला..मेहनतीने पैसे कमवतात...तुम्ही का विरोध करता...आम्ही गप्प...तर तो अजून चिडला...मग तो बारबालांवरून आम्हां मुलींवर घसरला...तो म्हणाला...ये लडकिया अंदर पेट के लिए नाचती है...तुम भी तो पेट के लिए यहा इतनी रात को रास्ते पे खडी हो... आम्ही    सगळे पत्रकार त्याच्यावर ओरडलो...वातावरण चिघळलं..पोलिस मधे पडले...या गडबडीत बाईट झाला...आम्ही पण निघून गेलो..मग सतत मनात विचार येत होता...राग कसला येत होता...आमची तुलना बारबालांशी केली म्हणून...आम्हांला रस्त्यावर उभं राहणार्या बोलला म्हणून..आम्ही बातमी साठी,लोकांच्या प्रश्नासाठी झगडतो...समाजासाठी काही चांगलं करता येईल म्हणून पत्रकारिते मध्ये आलो...कदाचित नऊ ते पाच नोकरी मिळाली असती पण स्वताहून हे क्षेत्र निवडल...आणि आमची तुलना बारबालाशी.. खूप मनस्ताप झाला...आज तर पत्रकारांना प्रेस्टीट्यूट बोलतात तेव्हा हा प्रसंग नेहमी आठवतो....तेव्हा वाटलं नव्हतं पत्रकारांचा प्रवास बारबाला ते प्रेस्टीट्यूट होईल.

असचं एका नाईट शिफ्टमध्ये माहिम चर्च भागात कोणतरी बातमी करून आम्ही थांबलेलो...एका चॅनेलची मैत्रिण येत होती..तिला फीड ट्रान्सफर हवं होते....गाडीत शांत बसले होते..रात्रीचे दोन अडीचं झाले होते... अचानक रस्त्यावर आरडा ओरडा झाला..एक गाडी खूप वेगाने निघून गेली होती...रस्त्यावर घोळक्याने लोकं उभं होती...रस्त्यात काहीतरी पडलं होतं...काय गडबड झाली म्हणून पाहायला गेले...तर रस्त्यात एका बोटाएवढं एक अर्भक...त्या सुसाट जाणार्या गाडीतून कोणीतरी ते अर्भक रस्त्यात टाकलं...लोकांची गडबड ऐकत पोलिस आले...मग गर्दी दूर झाली...आम्ही जाऊन ते अर्भक पाहिलं...नुकताच फुटलेले हात..छोटे पाय...बंद डोळे...आयुष्यात फक्त डॉक्युमेंटरी मध्ये असं अर्भक पाहिलं होत..आयुष्यात पहिल्यांदा हे असं पाहून धक्का बसला...आणि इतकं निर्दयी कोण कसं असून शकतं की त्यांनी धावत्या गाडीतून हे असं अर्भक फेकून दिलं होतं...पोलिसांनी त्याच्यावर एक पेपर टाकलं नंतर..तपास करून ते अर्भक काढून हॉस्पिटलमध्ये नेलं..पोलिसांनी त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली...पण ते छोट अर्भक त्यांचे इवलेसे हात..पाय..बंद डोळे हे दृश्य अख्खी रात्र डोळ्यासमोरून गेलं नाही....माणूस किती निर्द्यी होतं चालला आहे...रात्रीच्या अंधारात कदाचित केलेल्या चुका पुसण्याची धडपड माणसाची सुरू असते का...की अंधाराची वाट पाहतो तो....



                  सगळ्यात जास्त रात्री काम करण्याचं चॅलेंज आणि थ्रील अनुभवलं ते उत्तराखंड येथील ढगफुटीच्या वेळी...रूद्रप्रयागला जाणारे मार्ग बंद झाल्याने आधी उत्तरकाशी गेले...तिथे गंगोत्री आणि यमनोत्रीला अडकलेल्या यात्रींवर बातम्या केल्या..मग जेव्हा बातमी आली की रूद्रप्रयागला जाणारा रस्ता सुरू झाला आहे..तेव्हा आम्ही निघालो...१८४ किमीचा प्रवास आम्हांला करायचा होता....ठरवलेल..जितकं अंतर कापता येईल तितकं पार करायचं ..कारण रूद्रप्रयाग वरून पुढे जोशीमठला जायचं होतं..बद्रीनाथला सगळ्यात जास्त मराठी पर्यटक असल्याची माहिती होती..त्यामुळे जोशीमठला लवकरात लवकर पोहचण्याचं टार्गेट होतं...उत्तरकाशीहून निघाल्यावर अर्ध्या रस्त्यात एक डिझेल वाहून नेणारा मोठा टॅंकअडकला होता..त्या टॅंकमुळे डोंगराच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली...पाच तास वाट पाहूनही उपाय नव्हता सुचत...आर्मीचे ट्रक ही अडकले होते...अनेक जवान रस्त्यावर उतरले होते...विविध प्रयत्न करून पाहिले..शेवटी टॅंकमधलं इंधन बाहेर काढण्याचं ठरवलं...इंधन मोठ्या मोठ्या पिंपात ओतले...टॅकचा भार हलका झाला...मग त्या टॅंकला रस्त्यातून बाजूला करण्यात यश आलं...दुपारी बाराला सुरू केलेला प्रवास जो मध्ये सात तास थांबला...परत रात्री नऊ वाजता आमचा प्रवास सुरू झाला...रस्त्यात काही गरजू लोकांना लिफ्ट दिली....जेवायला एक हॉ़टेल नाही...टॉयलेटची सुविधा नाही...आपला प्रवास कसा होणार...सात तास कसे भरून निघणार..जोशीमठला जायला उशीर होतं होता..सगळे प्रश्न समोर.. 
    रात्री बाराला एके ठिकाणी टाटा कंपनीच्या लोकांनी औषध,पुरी भाजीचा स्टॉल लावलेला दिसला...ड्राईव्हर..मी कॅमेरामन त्यावर तुटून पडलो..किती तरी तासाने खायला मिळाल.....जवळ एक टॉयलेट होत....हायसं वाटल.. पुन्हा प्रवासाला सुरूवात..ड्राईव्हरला विचारलं...पुरी रात गाडी चलायेगा..तो तयार होता..त्याला म्हटलं..कुछ भी करके सुबह रूद्रप्रयाग पहुंचना है....रूद्रप्रयाग हे त्या ड्राईव्हरचं घरं असल्याने त्याला सगळे रस्ते माहितं होते..तो तयार झाला...प्रवास सुरू झाला...कॅमेरामॅन ड्राईव्हरच्या बाजूला बसून डुलक्या काढायला लागला...मग पुन्हा गाडी थांबवली...कॅंमेरामॅनला मागे बसवलं..मी पुढे बसले...आणि ठरवलं झोपायचं नाही....रस्त्यात गुडूप अंधार...कुठला तरी मधला रस्ता प्रशासनाने सुरू केलेला..तिथेही दरडी कोसळतं होत्या...पण वेळ कमी म्हणून आम्ही जात होतो...खूप खड्डे...दगडी...चिखल...आणि गुडूप अंधार...या रस्त्यावर बिबटे असतात हे ही काही लोकांनी सांगितलेलं...म्हणून अजून भीती वाटतं होती...झोप खूप येत होती...पण झोपू शकत नव्हतो...गाडीत ट्रक डाईव्हर गाणी लावतात तशी आयटम नंबर गाणी लावली...इतकी बकवास गाणी आयुष्य़ात ऐकली नव्हती ती त्या प्रवासात फक्त रात्री जागण्यासाठी ऐकली...मध्ये रस्त्यात बिबटा दिसला असं वाटल..आता भीती वाटायला लागली...रस्ते खूप खराब होते..मध्यरात्री तीनच्या सुमारास गाडी बंद पडली...एवढ्या अंधारात बाहेर पडण्याची भीती वाटतं होती..कुठून बिबटा आला तर...एक तास गाडी बंद ठेवली...गाडीत बसून राहिले..ड्राईव्हर एक तासाने पुन्हा खटपट करत होता..अखेरीस गाडी सुरू झाली.आणि प्रवास सुरू पुन्हा प्रवास सुरू झाला.......
पहाटे रूद्रप्रयागला पोहचलो असं वाटतं असताना अचानक तीन किमी अंतरावर रस्ता तुटल्याने पुन्हा पंचवीस किमी फिरून मागे येऊन दुसर्या रस्त्यांने रूद्रप्रयाग मध्ये आलो...गाडीतलं पेट्रोल संपत आलेल...पेशन्स संपले होते...खूप थकलो होतो....रूद्रप्रयाग समोर दिसताचं..जीव भांड्यात पडला....आज पर्यंत रात्रीचे अनेक प्रवास केले...पण हा प्रवास मात्र सहनशक्तीची परिक्षा घेऊन गेला.

      माझी अम्मा..जिने आम्हांला वाढवल...आई नोकरीला जात असल्यामुळे आमची काळजी तिचं घ्यायची..अशी अम्मा कॅन्सरने आजारी होती...उपचाराने थकल्याने अम्मा घरीचं होती...घरात रात्री एक बाई थांबायच्या ...नोकरी लागल्यावर आणि विरार ते चर्चगेट प्रवास झेपायचा नाही म्हणून मी घाटकोपरला पीजी रहात होते...नाईट शिफ्ट असली की घरी विरारला जायचे  ..तिथून मग ऑफिसला...त्या दिवशी रात्री अम्माशी बोलले..गप्पा मारल्या..नाईटसाठी ऑफिसला आले...मध्यरात्री साडे तीन वाजता आईचा फोन आला...आई काय बोलतेय..समजतं नव्हत....अम्माला मुंग्या लागल्या...मुंग्या लागल्या...बोलतं होती...काही समजलं नाही...पप्पानी फोन घेतला आणि सांगितलं...अम्मा गेली..डॉक्टर येत आहेत..मी सुन्न झाले....अम्माला कॅन्सर झाला..ती कधीतरी जाणार..किवा तिच्या वेदना पाहून वाटायचं ह्या वेदना संपल्या पाहिजे...आणि आज जेव्हा ती खरचं गेली तेव्हा विश्वास बसला नाही....पहाटे लवकर ट्रेन पकडून घरी गेले...अम्माचं पार्थिव होतं..सगळे नातेवाईक आले..दुपारपर्यंत अंत्यसंस्कार झाले...खूप रडू आलं नाही...पण काहीतरी रिकाम झालं..असं वाटतं होते...एका आठवड्याने ऑफिसला आले...पुन्हा नाईट शिफ्ट होती...पण यावेळी पिकअपला आलेल्या ड्राईव्हरला म्हटलं ...मला मरिन ड्राईव्हला सोड....बारा वाजेपर्यंत ये....साडेदहा वाजता मी तिथे गेले...मरिन ड्राईवच्या समुद्राबरोबर शांत बसले...ते कधी रडायला आलं..कळलं नाही...या जगात अम्मा आपल्याला एकटं टाकून गेली...आपण कायमचे एकटे पडलो...ही भावना काय असते...हे तेव्हा जाणवलं...खूप रडले...रात्री साडेबारानंतर ऑफिसला गेले...
     आणि तिथून नाईट शिफ्टला असताना मरिन ड्राईव्हला जाऊन एकटं बसण्याची सवय पडली...कधी गाणी ऐकत...तर कधी लाटांचा आवाज ऐकत...सगळ जग शांत होतं असताना...आपल्या मनातील अशांतता अजून ठळक होत जाते....मनातला राग,अस्वस्थता...उफाळून वर यायची....समु्द्र हे पाहत रहायचा...मूक साक्षीदार होत.. कधी मित्र बनून...अनेकदा रडले त्याच्या साक्षीने.. कधी त्याच्याकडेचं न्याय मागितला...तर कधी मार्ग ...रात्रीच्या अंधाराने आपलं दुख..एकटेपणा...लपवत...जगणं शिकवल...



Tuesday 15 September 2015

11 जुलैचा बॉम्बस्फोट , रक्ताचे पाट, प्रेतांचे ढीग आणि मी.....




            11 जुलै 2006 दुपारची शिफ्ट होती, सकाळी TV वर  'पेज 3' मूव्ही पाहत होते. त्यात ती पत्रकार मुलगी बॉम्बस्फोट बघून कशी घाबरते तो सीन पाहिला आणि मनात विचार आला, आपण स्वतः बॉम्बस्फोट झाला तर कसे रिअक्ट होऊ?. आपण अशी कोणती घटना आजपर्यंत रिपोर्टिंग केलेली नाही. हा विचार असाच रेंगाळला. ऑफिसला पोहोचले.

संध्याकाळी 6.30 नंतर ऑफिसमध्ये लँडलाईनवर रिपोर्टर्सना फोन आले. बॉम्बस्फोट झालाय. ऑफिसमधून पहिली  टीम बाहेर निघाली ती आमची.. तेव्हा स्फोट रेल्वेच्या कोणत्या डब्यात झाला. याबाबतची काहीही माहिती नव्हती. माटुंगा आणि माहिम ब्लास्ट इतकंच कळलेलं.


            नरीमन पॉइंटवरुन माटुंग्याला पोहचायला 2 तास लागले. ट्रेन ब्लास्ट झाल्यामुळे सगळं ट्रॅफिक रस्त्यावर. काय करायचं समजेना. दादर नंतर बरंच अंतर चालत गेलो.. मध्येच बातमी आली एका फोटोग्राफर मित्राला माहिमला मारहाण झाली. त्यामुळे जे करायचं ते नीट हे स्वतःला बजावून माटुंगाला पोहचलो.

माटुंगा स्टेशन पूर्वेला गेलो. रेल्वेच्या भिंतीवरून उडी मारून ट्रॅकवर आत जाऊन व्हिज्युअल्स घ्यायचे असं ठरलं. कॅमरामन जाताच आसपास उभे असलेले लोक, महिला चिडल्या. आम्हांला खूप ऐकवलं. तरी कॅमरामेन चढला. त्याला कॅमरा दिला तो आत ट्रॅक वर गेला.  पण बाहेरच्या लोकांनी मला घेरलं. सगळ्यांना पुढे हात जोडले. म्हंटलं जे झालं ते दाखवणे आमचं काम आहे. समजून घ्या... ही मोठी बातमी आहे. तेव्हा जे सुचलं ते सांगितलं. थोडा वेळ वाद सुरु होता. मी त्यांना  माझा मोबाईल दिला, कुणाला घरी फोन करायचा तर करा. मेसेज करा. इथे लोकांना मदत करण्यासाठी आलो आहोत. शेवटी सगळे शांत झाले.

कॅमरामेन व्हिज्युअल्स घेऊन परत आला. लोकांच्या बाहेर प्रतिक्रिया घेतल्या. आमचे रनर अण्णा त्यांच्या हातात टेप दिली. माहिमच्या दिशेने गेलो. माहिम स्टेशनला आत शिरल्यावर त्या पांढऱ्या फर्शीवर रक्त...काही समजेना. ट्रॅक वर गेलो. फाटलेला आख्खा डब्बा समोर. ट्रॅक वर काही मांस, रक्त, माहिम स्थानकातील जखमी, मृतदेह सगळं गेलेला. पण तरीही मागे खुणा ठसठशीत.

ट्रॅक वर चालताना पाऊस आला. जणू रक्त साफ करून गेला. त्या खुणा मिटवून गेला.. लोकांचे एक एक अनुभव. अंगावर काटे आणत होते. टॅक्सी थांबली नाही. समोरच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांनी चादरी आणल्या. शरीराचे तुकडे उचलून टाकले. काही टॅक्सी वाल्यांनी मार खाल्ला. सीट ख़राब होईल म्हणून जखमींना घ्यायला नाकारत होते.

माहिमला व्हिज्युअल्स, प्रतिक्रिया घेऊन अंधेरीच्या दिशेने निघालो. ऑफिसकडून मेसेज आला, सोनिया गांधी कूपर हॉस्पिटला भेट देऊ शकता तिथे जा.


            रस्त्यात ज्यांना जमेल त्यांना लिफ्ट दिली. जागोजगी मुंबईकर उभे राहून बिस्किट, फळं आणि पाणी वाटत होते, जबरदस्ती हातात बिस्किटाचा पुडा कोंबत होते. त्यांनी दिलेलं आम्ही इतरांना वाटत होतो. कूपरला पोहोचलो. कूपर मध्ये सगळ्यात जास्त मृतदेह आले आहेत ते कळलं. जिथे जखमी आणि मृतदेह होते, तिथे पत्रकारांची तपासणी करून पाठवत होते. आतमध्ये गेले. आयुष्यात पहिल्यांदा इतके मृतदेह  पाहिले एकाच वेळी.  काळे...नीळे...केस जळलेले.... कुठे नुसते हात.. तिथून जखमींच्या वॉर्ड मध्ये गेले.  छर्रे डोक्यात गेलेले काही जण....काही बेशुद्ध...काही शुद्धित.... तेवढ्यात एक बाई जोरात किंचळली.. नर्स धावत तिच्याकडे गेली... इंजेक्शन दिलं...झोपवलं तिला.... नर्सने सांगितलं.... शॉक लागला आहे तिला...ती मध्येच उठून ओरडते. 

हे सगळं एकामागून एक घडत होतं. आजपर्यंत असं काहीच पाहिलं नव्हतं. हे सगळं आतमध्ये अजूनsync पण नव्हतं झालं. ह्या सगळ्यात आई नेमकी कुठे आहे ह्याचा पत्ता लागत नव्हता. आई पण त्याचवेळी घरी जायची. फोन लागत नव्हते. पप्पा घरी पोहचले होते इतकं माहित होतं.

         आम्हांला जखमींची किंवा मृतांची जी नावं हॉस्पिटलमध्ये मिळतील ती ऑफिसला द्यायला सांगितली. कारण अनेकजण एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये वेड्या सारखे फिरत होते. आपला माणूस कुठे आहे..जिवंत आहे की मेला, जिवंत आहे तर काय अवस्था,  मेला तर मृतदेह कुठे?  हॉस्पिटलमध्ये इतका गोंधळ. नातेवाईकांची रडारड, कोणी अस्वस्थ मनाने कुणाला तरी शोधत होतं. आसपासची लोक पाणी, जेवणाच सामान घेऊन आले होते. प्रत्येकाला आस्थेने विचारत होते. त्यात काही राजकारणी पण पांढरे शुभ्र कपडे घालून आले. काही चॅनेलवाल्यांना बाईट दिला. की मी कशी मदत करतोय. खाण्याचं सामान दिलं... त्यांचं बोलणं ऐकून लोक चिडले. आरडा ओरडा झाला...नेता गुपचुप निघून गेला.

ह्या सगळ्या गडबडीत एक काका भेटले.. ते त्यांच्या मुलाला शोधत होते. त्यांचे इतर कुटुंबातील सदस्य दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शोधत होते. त्यांनी मला पण विचारलं... ह्या नावच कुठे कोणी दिसलं, भेटलं का... ते अस्वस्थ होऊन फिरत होते. ते एकटेच फिरत होते. आम्ही बातम्या करत फिरत होतो. काही वेळाने ते काका एका कोपऱ्यात रडत असताना दिसले. ते इतकंच म्हणाले बॉडी यही है.

गेले चार-पाच तास ज्या मुलाला शोधत होते, त्याचा मृतदेह तिथेच होता. इतर कुटुंबियांना कळवलं होतं. पण आता बंध तुटला. एकटे रडत होते.. त्यांच्या पाठीवरुन हात फिरवला.... पाणी दिल..... गप्प रडत होते.... थोड्या वेळाने काही कुटुंबातील सदस्य आले... आम्ही परत बातम्यांच्या मागे..

हॉस्पिटल मध्ये रक्तदान करा.. असा बोर्ड लावला होता... मी आणि कॅमरामेन दोघं रक्तदान करायला गेलो... तर तिथे कळलं की आसपासच्या इतक्या लोकांनी रक्तदान केलं की हॉस्पिटलने सांगितलं आता रक्ताची गरज नाही.... गरज पडल्यास संपर्क करू... नाव आणि फोन नंबर दया.... आम्ही नाव नोंदवलं.... अंधेरी ऑफिसला जाऊन फिड, बातम्या दिल्या.

                     मध्यरात्री कधी तरी आईशी बोलण झालं.. ती सुरक्षित होती.. बोरिवालीला आईच्या ट्रेनमध्ये ब्लास्ट झालेला... आई बोरीवली वरुन बस, रिक्षा, टेंपो... असा प्रवास करत विरारला पोहोचली होती..  रात्री 3.30 च्या सुमारास पुन्हा नरीमन पॉइंट ऑफिसच्या दिशेने निघालो....आता जाणवलं की आपण आज जेवलोच नाही आहोत... दादरच्या जवळ कोणत्या तरी हॉटेलच शेल्टर खाली खेचलेलं..पण पोलिस बाहेर खात उभे होते. तिथेच मी, कॅमेरामन आणि ड्राईवरने पाव भाजी खाल्ली..

नरीमन पॉइंट ऑफिसला आलो.. काही रिपोर्टर सकाळी पुन्हा लोकल ट्रेन सुरु झाल्या ती बातमी करायला गेले..मी घरी आले.. फ्रेश होऊन पुन्हा ऑफिसला गेले... या बॉम्बस्फोटात अनेक जखमीचे अनुभव  त्यांच्या बातम्या करायला..

               ह्या बोम्बस्फोटच्या वेळी मराठी न्यूज चॅनेल्स 24 तास नव्हते.. ई टीव्ही मराठीला तर काही तासांनी बातमीपत्र होतं. संध्याकाळी 7 चे 'महाराष्ट्र माझा',  रात्री आपली मुंबई ही बातमीपत्रं सगळ्यात जास्त पाहिली जात होती. संध्याकाळी 6.25 ला ब्लास्ट झाले तरी एवढ्या कमी वेळात 7 वाजता बातमी गेली. बातमीपत्रांमध्ये खाली टिकरवर हॉस्पिटल आणि रुग्णांची नावं द्यायला सुरुवात केली. आम्ही सगळे रिपोर्टर्स ही नावं अपडेट करत होतो. बातमीपत्र नसतानाही माहिती देणारे टिकर सुरु होते.

पत्रकारितेत आल्यावर पाहिलेला , रिपोर्टिंग केलेला हा पहिला दहशतवादी हल्ला होता. तेव्हा मीडियाकडे स्मार्ट फोन नव्हते. शूट केलेला फिड पाठवण्याची साधनं कमी होती.. आणि  इलेक्ट्रॉनिक मीडिया रांगत असताना झालेला हा हल्ला होता.

बातम्या कशा करायच्या काय करायचं. हे सगळं आम्ही तेव्हा शिकलो. अशा घटनांच्या वेळी डोकं शांत ठेवून काय टाळायचं. नेमके काय करायचं. ही घडण झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा वेळी पत्रकार असलो तरी माणूस म्हणून काही गोष्टी केल्या पाहिजे हा धडा ह्या रेल्वे बॉम्बस्फोटाने दिला

Wednesday 2 September 2015

राजधानीची शिकवण!



                  दिल्ली सोडून  एक वर्ष झाल..दिल्लीतील शेवटचे काही दिवस हे दिल्लीत चार वर्षाची शिकवण पुन्हा एकदा देणार ठरल.
                 2010-2014 चार वर्ष दिल्लीत काढली..लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईला शिफ्ट व्हायचं ठरवलं होत..
२०१४ लोकसभा निवडणुका झाल्या...मुंबईत परतं जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले...नोकरीच्या शोधात होते...या सगळ्यात एक समस्या अशी होती की,ज्या घरात रहात होते,तिथे साधारण लोकसभा निवडणुकीपर्यंत राहिन अशी कल्पना होती..रूममेटचं लग्न ठरलेलं...ती लग्न करून ऑगस्टमध्ये नवर्याबरोबर परत येत होती,त्यामुळे ते घरं सोडण्याशिवाय पर्याय नव्हता..चार वर्ष,चार घर झाल्यावर मलाही घराचे वेध लागलेले..पुन्हा घरं शोधा,सामान शिफ्ट करा...सगळ नकोसं झालेल...एकीकडे घर सोडण्याची डेड लाईन....दुसरीकडे नोकरी मिळेना....

रूममेट येणार म्हणून माझ टीव्ही,फ्रिज सामान दीड-दोन हजार रूपयात विकून टाकल..घरातील पुस्तक कपडे बॅगा भरल्या...एक मुव्हरर्स आणि पॅकर्स जस्ट डायल वरून शोधला...त्याला सांगितलं हे सामान मुंबईत घरी पाठवायचं,पैसे दिले,,,तो घरी आला तेव्हा असं जाता जाता म्हणाला..."आप तो अकेली है,घर में मर्द नही..कितनी परेशानी होती होगी..कैसे कर लेते है आप..." आता या माणसाला काय उत्तर द्यायचं म्हणून गप्प बसले...सामान वेळेत गेल..म्हणून टेन्शन गेल...  

           आता रहायला घरं हवं होतं...रक्षाबंधानानिमित्त पंधरा दिवस एक मैत्रिण गावी जात होती..ती म्हणाली माझ्या घरी रहा..त्यामुळे किमान पंधरा दिवस राहण्यासाठी घरं मिळाल..या दरम्यानं नोकरीचा शोध सुरू होता..घरी पाठवलेलं सामान घरी दहा दिवस होऊनही पोहचलं नव्हतं...फोन केला तर तो मुव्हर्स आणि पॅकर्सवाला फोन उचलतं नव्हता,,थोड टेन्शन आलं..
दोन-तीन दिवसाने त्याने फोन उचलला,म्हणाला,"मॅडम टेन्शन मत लो,सामान पहुंच जायेगा"
परत काही दिवस वाट पाहिली..सामान अजून पोहचल नव्हत...एकदा त्याला फोन केल्यावर तो इतक्या वाईट टोनमध्ये बोलला,"मॅडम इतना टेन्शन मत लो,आईना,जरा हम से मिलीये..बैठ के बाते करेंगे" तिथेचं डोकं खराब झालं...आणि मग त्याला शिव्या दिल्या...दिवसेंदिवस त्या माणसाशी बोलण कठीण झाल..फोन केला तर उचलणार नाही...उचलला तरं हे असं बोलण....सामान घरी पोहचलं नव्हत...परत दहा फोन केल्यावर कळलं सामान मुंबईत गोडाऊन मध्ये पडलं आहे..आणि सामान घरी शिफ्ट करण्यासाठी मी दिलेले पैसे त्याने मुंबईतल्या माणसाला दिले नव्हते..उलटं मलाचं फोन करून सांगितल,सामान घेऊन जा गोडाऊनमधून...
मग अजून चिडचिड झाली...पैसे दिले,विश्वास ठेवला आणि आपल्याला खड्ड्यात घातल..मुंबईतला मुव्हर्सवाला चांगला होता,तो म्हणाला"दीदी हमे पैसा नहीं दिया हम क्या करे" 

ह्या सगळ्या गडबडीत मुंबईत नोकरी मिळाली...लवकर दिल्ली सोडावी लागणार होती कारण पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस मैत्रिणीकडे राहत होते..ती पण गावावरून परत आलेली..तिचे घरमालक ही विचारत होते.. 
मुंबईत परत जाण्याची तयारी सुरू होती... पण मुंबईत माझं सामान गेलं नव्हतं...शेवटी त्या मुव्हर्स आणि पॅकर्सवाल्याच्या ऑफिसला नोएडामध्ये गेले...पत्ता शोधता शोधता नाकेनाऊ आले...दिलेल्या पत्त्यावर गेल्यावर धक्का बसला,तिथे त्याचं ऑफिसचं नव्हत..त्याने दिलेल्या पत्त्यावर दुसऱ्याचं एका मुव्हर्स आणि पॅकर्सवाल्याचं ऑफिस होतं...आता तर खूपचं राग आला..आपल्याला एका माणसानं फसवल..आपण शिकलेले,दिल्लीचा अनुभव नेहमीचं वाईट येऊनही आपण आपलं सामान असं दिलचं कसं...बाजूच्या ऑफिसमध्ये चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलं की त्या मुव्हर्सवाल्यानं असं अनेक महिलांना फसवलं आहे...काही महिला इथेही येऊन गेल्या आहेत...हे  ऐकून तर वाटतं होतं, आपण इतके मूर्ख कसे...कोणी आपल्याला इतक्या सहजपणे टोपी घालून जाऊ शकतो..

         शेवटी नोएडा पोलिसांकडे गेले...त्यांना सगळा प्रकार सांगितला,नोएडा रिपोर्टर पण पोलिसांशी बोलला..पोलिसांनी त्यांच्या मोबाईल वरून त्या मुव्हर्सवाल्याला फोन लावला..त्याची चौकशी केली..मग  विचारलं, हे रश्मी पुराणिकचं सामान का नाही घरी पाठवल...पैसे घेतलेस तरी सामान गोडाऊनला पडून आहे,वरून त्यांना सांगतोस सामान घेऊन जा..पोलिसांचा चढता सूर पाहताच पाच मिनीटात मुव्हर्सवाल्याने हार मानली..आजच्या आज सामान घरी पोहचवतो..असं सांगितल..पोलिस मला म्हणाले तुम्ही मला संध्याकाळी सामान घरी पोहचलं की नाही कळवा..मी जस्ट डायलाला पण फोन करून या मुव्हर्स आणि पॅकर्सवाल्याची तक्रार केली..त्याचं ऑफिस नाही,खोटा पत्ता दिलाय,सर्विस अनेकांना दिलेली नाही,वाईट भाषेत बोलतो...जस्ट डायलने मेलवरून तक्रार घेतली,त्याला डिलीस्ट करू सांगितल.

                       तिथून ऑफिसला गेले,काही काम बाकी होतं...ऑफिसमध्ये असताना त्याचा फोन आला...जो माणूस एवढे दिवस माझा फोन उचलतं नव्हता...उचलला तर अर्वाच्य भाषेत बोलतं होता..तो आता माफी मागत होता..
मला म्हणाला,"मॅडम,क्या आप..पुलिस के पास क्यू गई..मैंने आपको कहा था सामान घरं पहुंच जायेगा."
इतकचं ऐकून डोक असं सटकल....आजपर्यंत आयुष्यात ज्या शिव्या दिल्या नव्हत्या...ग.भ.भ.न ची संपूर्ण बाराखडी त्याला बोलून दाखवली आणि..सांगितलं तुझ्यासारख्या लोकांना पोलिसांची भाषा समजते..तू अनेक महिलांना फसवलं तेव्हा लाज वाटली नाही का...मग म्हणाला, इतरांचं सोडून द्या,तुमचं सामान घरी पोहचवतो..त्याचा आवाज ऐकून इतका राग येत होती की  फोन कट केला.
                      दोन तासात मुंबईत घरी सामान आलं...त्यानंतर चोवीस तासाने मी दिल्ली सोडली मुंबईसाठी...पण शेवटच्या दिवसापर्यंत दिल्ली शिकवतं राहिली...कोणावरही विश्वास ठेवू नये..